Skip to main content

गुरूजींचे विचारधन : सत्य आणि विपर्यास - भाग २ (मुल्यमापन)

ह्या भागात गुरूजींनी मुसलमान, ख्रिश्चन, कम्युनिस्ट देशाला धोकादायक असल्याचे लिहीले आहे. हे लिखाण तत्कालीन परिस्थितीला अनुसरून असल्याने वर्तमानाचे संदर्भ लादण्यात काहीच अर्थ नाही. संघावर मुस्लिमविरोधी, ख्रिश्चनविरोधी असल्याचा आरोप जन्मजातच होत आहे. पण डॉ. हेडगेवार कधीही देशाच्या दुरावस्थेबद्दल मुसलमान वा ख्रिश्चनांना दोष देत बसले नाही.
"आपणच आपले स्वत्व विसरलो, म्हणून शत्रुचे फावले" असे सखोल चिंतन त्यांनी केले.
केवळ मुस्लिमविरोधी वा ख्रिश्चनविरोधी भावना उत्पन्न करून नव्हे तर हिंदुंना त्यांच्या राष्ट्रीय एकात्मेची जाणिव करून दिल्यानेच भारताचे दिवस बदलतील. असा विचार संघसंस्थापकांनी केला.

संघ आणि मुसलमान -
मुस्लिम विचारवंत आणि राष्ट्रवादी मुस्लिमांबद्दल सगळे आदरभाव राखतात, कारण ते राष्ट्रीय भूमिका घेऊन बोलतात. संघ स्वयंसेवकही त्याला अपवाद असायचे काही कारण नाही.
संघ खरोखरच मुस्लिमविरोधी आहे का ? दुर्दैवाने ह्या प्रश्नाची समीक्षा करणारे खुपच कमी लोक आहेत. काही लोकांना मुझफ्फर हुसेन हे नाव माहिती नसेल. ते ज्येष्ठ पत्रकार होते, महाशिवरात्रीला त्यांचे निधन झाले. ते संघाचे समर्थक होते. त्यांच्या लहानपणीची घटना आहे,
त्यांचे शिक्षक गौड हे कट्टर संघविरोधक होते.
त्यावेळी नीचम येथे बौद्धीक कार्यक्रमाला गुरूजी येणार होते. त्यावेळी संघाचा निषेध करणारी पत्रके गुरूजींच्या सभेत वाटायचं काम हुसेन ह्यांच्यावर सोपण्यात आले. पत्रके वाटताना संघाच्या लोकांनी त्यांना पकडले आणि थप्पड मारली. सभा संपल्यानंतर गुरूजींसमोर उभे केले. मात्र गुरूजींनी अत्यंत प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरविला. आणि रसखानच्या कविता ऐकल्या, पाठिवरून हात फिरून त्यांना सोडून दिले. ही घटना आयुष्यभर त्याच्यां स्मरणात राहिली.
गुरूजी आणि पाचवे सरसंघचालक के. सी. सुदर्शन ह्यांच्यावर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती.
अजून एक नाव सुचते ते म्हणजे जफर ईरशाद.
हेसुद्धा पत्रकारच आहेत. त्यांनी "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - निस्वार्थ मानवी सेवेचे प्रतिक" हा लेख लिहीला आहे. अहमद शेख ह्यांचा "संघ, भारत आणि मुसलमान" हा लेखसुद्धा वाचण्यासारखा आहे. सुदैवाने हे अहमद शेख आमच्या स्वयंसेवकाचे मित्र आहेत. विचारवंत अन्वर राजनदेखील म्हणतात कि, संघावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. माजी राष्ट्रपती डॉ. झाकिर हुसेन ह्यांनीदेखील संघाच्या शिबीराला भेट दिली होती. संघपरिवारात मुस्लिम राष्ट्रीय मंच ही संघटना आहे. सामाजिक समरसता सेवा प्रकल्पांत सर्व जाती-पंथाच्या नागरिकांना मदतीचा हात दिला जातो. त्यातील एक नाव आहे, सलिमुन्नीसा अली ! या महिलेच्या मुलीचा आजार दूर झाला तेंव्हापासून ती संघाच्या सेवाप्रकल्पांशी कायमची जोडली गेली आहे. मुस्लिम असूनही संघात जातीधर्माला नव्हे तर माणुसकीला स्थान असल्याचे सांगताना ती जराही कचरत नाही. सरकार्यवाह भैय्याजी जोशी ह्यांच्यासमोर बोलत असताना तिच्या डोळ्यातून पाणी आले. सलिमुन्नीसा ह्या मुळच्या उ.प्र.तील सिध्दार्थनगर जिल्ह्यातील तितौली या गावच्या. २१ वर्ष अगोदर त्यांचे कुटूंब नागपुरला स्थायिक झाले. पती अख्तर अली मुंबईत नोकरी करायचे आणि सलिमुन्नीसा दक्षिण नागपुरातील
श्रीनगर-रानवाडी भागात राहत होत्या. शहरात फारसे कोणीही परिचित नव्हते. त्यातच मुलगी साबिया अली हिची तब्येत वारंवार बिघडायची.
उपचार सुरू असतानादेखील मुलीची तब्येत जास्त बिघडली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची व त्यात एकटी महिला अशा परिस्थितीत त्या घाबरल्या होत्या. त्यांची अडचण संघाच्या सेवाप्रकल्पांचे काम पाहणारे वीरेंद्र मल्हाेत्रा यांना कळली. मल्होत्रा यांनी तात्काळ जवळच चालविण्यात येत असलेल्या सेवा प्रकल्पांबद्दल माहिती दिली व डॉक्टरांची भेट घालून दिली. रात्री दोन वाजता डॉ. प्राची पुराणिक ह्यांनी त्या मुलीवर इलाज केला. मुलगी वाचेल कि नाही चिंता सतावीत असताना संघ पदाधिका-यांनी मला हिम्मत दिली आणि आज माझी मुलगी चक्क पायावर उभी आहे. आता माझे पती अख्तर अली ह्यांना कर्करोग झाला असून त्यांच्या उपचारासाठीदेखील सेवाप्रकल्पातील कार्यकर्ते सातत्याने मदत व मार्गदर्शन करतात,
असे तिने सांगितले. देशात अनेकजण असहिष्णुतेबद्दल बोलत असले तरीही मला मात्र कधीच असुरक्षितता वाटली नाही. माझ्या नातेवाईकांनी मला मुस्लिमबहुल भागात राहण्याचा सल्ला दिला, मात्र मला येथेच सर्वांची आत्मीयता मिळाली अाहे. असे तिने सांगितले.
तुषार दामगुडेंचा "खिलाफत ते रोहिंग्या" हा लेख सा.विवेकमध्ये आला आहे तो अवश्य वाचा. जरी गुरूजींनी इस्लामच्या विचारसरणीवर कठोर टीका केली असली, तरीही मोहम्मद पैगंबराबद्दल त्यांनी कधीही एक वाईट अक्षरही बोलले नाही.

अटलबिहारी वाजपेयी - रा. स्व. संघावरील बंदी उठविली गेली तेंव्हा गुरूजी काशीला आले होते. काशीच्या नगरपालिकेने त्यांचे अभिनंदन करायचे ठरविले. नगराध्यक्ष एक मुस्लिम सज्जन होते ! नगरपालिकेत काही मुस्लिम प्रतिनिधी निवडूून आले होते. नगराध्यक्ष आपल्या स्वागत भाषणात म्हणाले, आम्ही गुरूजींचा सन्मान करतो, पण संघाबद्दल आमच्या मनात काही शंका आहेत. काही भय आहे, पण त्यांना बघताच ते भय नाहीसे झाले !
त्यांच्या भारतात मुसलमानांचे स्थान काय असेल ? त्यावर गुरूजी म्हणाले, मुसलमानांना काय स्थान असेल, हे ठरविणारा मी कोण आहे ? हे त्यांनीच ठरविले पाहिजे. कोणाच्याही उपासना पद्धतीशी आमचे कोणतेच वैर नाही, पण उपासना पद्धती सोडून बाकी सर्व गोष्टींसाठी आपण एकत्र आले पाहिजे.
नगराध्यक्ष त्यांचे आभार मानत म्हणाले, गुरूजींनी जे विचार मांडले त्याच्याशी आमचे कोणतेही मतभेद नाहीत. तरीदेखील लोक गुरूजींना मुस्लिमविरोधी का म्हणतात ? आम्हाला माहित आहे कि, त्यांच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही.

संघ आणि ख्रिश्चन -
गुरूजी नागपुरमधील हिस्लॉप मिशनरी कॉलेजमध्ये शिकत होते. तिथे बायबल शिकविणे अनिवार्य होते. याच काळातील एक घटना आहे, प्राचार्य गार्डियन ह्यांनी बायबलमधील दिलेला संदर्भ होता. गुरूजींची स्मरणशक्ती फार चलाख होती. सरसंघचालक असताना ते भाषण व चर्चेत अनेकदा बायबलचा संदर्भ देत असत. येशु ख्रिस्ताच्या जीवनातील अनेक घटना व वचने ते उद्-घृत करीत आधुनिक ख्रिस्तानुयायी म्हणविणारा समाज त्यांच्या शिकवणुकीपासून किती दुर गेला आहे ह्यावर नेमके बोट ठेेवीत. प्राचार्य गार्डियन ह्यांचा संदर्भ चुकला होता असे गुरूजींना वाटले व त्यांनी तसे उभे राहुन सांगितले. जो उतारा ह्या संदर्भात अभिप्रेत होता तो घडाघडा वाचून दाखविला.
मग प्राचार्य महाशयांनी बायबल मागवून मुळातून सगळा संदर्भ वाचला. तेंव्हा त्यांना कळले कि, ह्या विद्यार्थ्याचा आक्षेप बरोबर आहे.
आपलीच गफलत झाली. मग त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला शाबासकी दिली. येशु ख्रिस्ताबद्दल गुरूजींना नितांत आदर होता. मात्र फसवून वा प्रलोभने दाखवून ख्रिस्ती बनविणा-या, राष्ट्रधर्मापासून अशा धर्मांतरितांना तोडणा-या व भारतीयांमध्ये नाना कलहबीजे पेरणा-या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर प्रचंड कोरडे ओढले. अशा लोकांवर का टीका करू नये ? पुरोगाम्यांनी ह्या प्रश्नाचे पटेल असे उत्तर द्यावे ! माझं उदाहरण सांगायचं झालं तर माझेही एक मित्र ख्रिश्चन आहेत. माझे वडिल डायलेसिसने त्रस्त होते,
त्यांचे डायलेसिस करणारे टेक्निशियन ख्रिश्चनच आहेत. त्यांचे नाव विनोद गायकवाड.
त्यांनासुद्धा माहित आहे कि, मी संघ स्वयंसेवक आहे ! ते आम्हाला औषधं स्वस्त मिळवून देण्यासाठी मदत करायचे. माझे वडिलांचा मनमिळाऊ स्वभाव होता. जेंव्हा मी त्यांना डायलेसिससाठी घेऊन जायचो तेंव्हा ते हॉस्पिटलमधील टेक्निशियन,नर्स, मावशांसाठी कॉफी मागवायचे. मी, माझे वडिल, विनोद ह्यांच्यात मैत्रीपुर्ण संबंध निर्माण झाले. माझ्या वडिलांचे मागच्यावर्षी निधन झाले. पण आजही मी आणि विनोद ब्रदर संपर्कात आहोत.
जे लोक सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता ही लेबल चिकटवून मिरवतात. त्यांनी स्वताला प्रश्न विचारा कि, ह्या विचारांशी आपला दुरान्वये संबंध आहे का ? धार्मिक सलोखा बिघडायला कोण जवाबदार आहे ?, कट्टरता का निर्माण होते ? स्वताचे आत्मपरिक्षण केल्यास ह्या प्रश्नांची उत्तरे हमखास मिळतील !
मला ह्या So called सेक्युलरांना विचारायचं आहे कि, सर्व धर्मांना सारखी वागणूक कधी देणार ?, अजून किती दिवस दुटप्पी वागणार?, आपली ढोंगी व पक्षपाती भूमिका सोडून कधी डोळसपणे आणि निष्पक्षपणे वागणार ?
सर्वधर्मसमभाव आणि सेक्युलरिझम ह्यातील फरक स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केंव्हाच स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, सगळे धर्म परमेश्वराने निर्माण केले आहेत त्यामुळे सगळे समान आहेत. सेक्युलरिझम म्हणजे ईहवाद. दैनंदिन व्यवहारात धर्माती लुडबूड होऊ न देणे म्हणजे सेक्युलरिझम होय. ३३ कोटी देवांची पुजा करणारे आम्ही हिंदू, त्यात अल्लाह व येशूची भर पडल्यास आम्हाला काहीच फरक पडणार नाही ! मी हिंदू आहे म्हणजेच सेक्युलर आहे.
माणसाने माणसशी माणूसकीने वागणे म्हणजे हिंदूत्व ! तर स्वताला सेक्युलर म्हणवून घेणा-यांनी स्वताला विचारावे कि, आपण सेक्युलर आहोत कि फेक्युलर्स ?

संघ आणि कम्युनिस्ट - साधारणपणे एकाच वर्षी म्हणजे १९२५ साली रा. स्व. संघ आणि भा.क.प.ची स्थापना झाली. संघाची स्थापना भारतात झाली, तर भा.क.प.ची स्थापना रशियातील ताश्कंद येथे झाली. व्यक्ती व्यक्तीवर संस्कार करून समाज आणि राष्ट्रात परिवर्तन घडविणे हा संघकार्याचा गाभा. तर जो आपल्या विरोधात बोलेल तो मात्र आपला शत्रू, आणि शत्रुला जगायचा हक्क नाही. ही माओची शिकवण ! शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठी लडताना आपल्याला डावे दिसतात, चांगली गोष्ट आहे ! कोणीही आक्षेप घ्यायचे कारण नाही.  पण आक्षेप कुठे येतो ? तर एकीकडे लोकशाही आणि संविधानाच्या गप्पा मारायच्या, तर दुसरीकडे संसदीय शासनपद्धत मोडून काढण्यासाठी नक्षलवाद, माओवाद्यांसारख्या क्रुर विचार आणि निर्घृण कृत्यांसाठी कुुप्रसिद्ध असणा-या चळवळींना जन्म द्यायचा. स्टॅलिन आणि माओच्या क्रुरकृत्यांसाठी कोणीही डाव्यांना दोषी मानणार नाहीत. पण ते आपल्या जवाबदारीपासून नाही पळूू शकत. जगभरात डाव्यांनी काय केले ?, जिथे साम्यवादी राजवट आली तिथे लोकांचे मुलभूत हक्क का संकुचित झाले ?, केरळ-प.बंगाल-त्रिपुरा ह्या राज्यांमध्ये संघ स्वयंसेवक, अभाविप, भाजपा कार्यकर्त्यांच्या देहाची खांडोळी का होते ?, काश्मिरी पंडित आज स्वताच्या देशात निर्वासितांसारखे हिंडत आहेत. ते का दिसत नाही ?, आझादी चाहिये असे नारे लावता. पण कधीही आतंकवाद से, अलगाववाद से, नक्षलवाद से आझादी असे नारे लावता का ?, ज्या विचारांना जगभर अपयश आले, ते विचार स्वीकारून सरकारवर आरोपांच्या फैरी झाडतात. ठीक आहे ! टीका करणे लोकशाहीचे लक्षण आहे. पण तुमचा आदर्श कोण ?, तुमचे योगदान काय ?, कोणाचा आदर्श मांडायचा आहे, स्टॅलिन कि माओचा ?, असे भरपुर प्रश्न आहेत जे डाव्यांना विचारले जाऊ शकतात. भारत लोकशाहीप्रधान देश आहे. इथे क्रांतीसारख्या गप्पा नाही चालत ! क्रांती घडवायची असेल तर संविधानिक मार्गाने घडवा, शस्त्राने नाही ! जर संसदीय शासनपद्धती आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल, तर कांगारू कोर्ट आणि माओवाद संपुर्ण नाकारला पाहिजे ! त्यांच्याशी कोणत्याप्रकारचा संबंध ठेवता कामा नये. - मिहीर कुलकर्णी.

संदर्भ सुची -
लोकमत - नागपुर : ३० जुलै २०१८.
श्रीगुरूजी - ८,९.

चित्रदालन -

Comments