नमस्कार मित्रांनो ! गेले काही दिवस मी "विचारधन" (बंच ऑफ थॉट्स) ह्या ग्रंथाचे वाचन
करत होतो. हा ग्रंथ द्वितीय सरसंघचालक प.पु.
मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरूजी ह्यांनी लिहीला आहे. ह्या ग्रंथाला अनेकजण संघाची गीता, कुराण, बायबल म्हणतात ! हा अतिशय महत्वपुर्ण ग्रंथ आहे. ह्या ग्रंथातील अनेक शब्दांना व वाक्यांना अधोरेखित करून अतिशय फालूत कॉमेंट्स केल्या आहेत. ह्या ग्रंथावर लिहायचे म्हटले तर ब्लॉग अपुरा पडेल, म्हणूनच काही महत्वाच्या (विपर्यास्त) मुद्यांचे खंडन करणार आहे. ह्यामुळे ह्या ग्रंथाबद्दल असणारे गैरसमज दुर होतील अशी खात्री आहे.
आक्षेप क्र. १ वर्णव्यवस्था
"ब्राह्मणोस्य मुखमासीत, बाहु राजन्य कृत
उरू तदस्य यद वैश्य, पदभ्या शुद्रो अजायत".
भावार्थ - ब्राह्मण म्हणजे मुख, राजा त्याचे हात,
वैश्य त्याच्या मांड्या, आणि शुद्र त्याचे पाय आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा कि, ज्या समाजात
अशी चतुर्विध व्यवस्था आहे तो हिंदू समाज आपला ईश्वर आहे.
आपल्या समाजाचे दुसरे एक खास वैशिष्ट्य म्हणजे वर्णव्यवस्था. परंतु आज त्या वर्णव्यवस्थेला जातिवाद संबोधून तिचा उपहास करण्यात येतो. आपल्या लोकांना असे वाटू लागले कि, वर्णव्यवस्थेचा उल्लेख करणेसुद्धा कमीपणाचे वाटू लागले आहे. वस्तुता वर्णव्यवस्था ही सामाजिक रचना आहे. परंतु या
लोकांना असे वाटते कि, समाजातील उच्चनीचतेच्या भेदाचीच ती निदर्शक आहे.
परिपुर्ण सामाजिक व्यवस्था -
संपुर्ण विश्वातील मानव समाज हा चार वर्ण व
चार आश्रम यांत विभागलेला आहेे. हे चार वर्ण म्हणजे, बुद्धिजीवी वर्ग, योद्धा वर्ग, उत्पादक वर्ग, श्रमजीवी वर्ग. हे वर्ण मनुष्याच्या कर्माप्रमाणे आणि गुणयोग्यतेप्रमाणे विभागलेले
आहेत, जन्मावरून नाही. याशिवाय जीवनाचे चार आश्रम आहेत - ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम,
वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. मानव समाजाच्या
उत्तम हितार्थ, जीवनाची अशी विभागणी असली
पाहिजे; अन्यथा कोणतीच समाज-संस्था निरोगी स्थितीमध्ये वाढू शकणार नाही. मानव समाजाच्या या संस्थेला "वर्णाश्रमधर्म पद्धती" असे म्हणतात. ही पद्धती सुसंस्कृती जीवनासाठी अगदी स्वाभाविक आहे. परम सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याला पात्र बनविण्याकरिता ही संस्था आहे.
ही काही एका विभागाचे दुस-या विभागावर
कृत्रिम वर्चस्व व्हावे म्हणून रचलेली संस्था नव्हे.
परम सत्याचा साक्षात्कार करणे हे मनुष्य जीवनाचे ध्येय जेंव्हा इंद्रियतृप्तीवरील आत्यंतिक आसक्तीमुळे लोप पावते, तेंव्हा स्वार्थी लोक वर्णाश्रम संस्थेचा उपयोग कमकुवत वर्णावर कृत्रिम अधिकार गाजविण्यासाठी करतात. कलियुगात अशी कृत्रिम हुकूमशाही आधीच अस्तित्वात आहे; परंतु सुज्ञ लोकांना माहित आहे की, वर्ण व आश्रमांचे हे विभाग सामाजिक व्यवहार सुव्यवस्थित राहावेत आणि आत्मसाक्षात्काराची उच्च विचारसरणी राहावी म्हणूनच आहेत; इतर कोणत्याही उद्देशासाठी नाही. या युगामध्ये सर्वजण जन्मत:च शुद्र, चौथ्या वर्णातील आहेत (जन्मना जायते शुद्र).
शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमुळे मनुष्य द्विज किंवा तृतीय श्रेणीतील बनतो. (संस्कारद् भवेद् द्विज:)
ज्ञान व संस्काराच्या जोपासनेने मनुष्य द्वितीय श्रेणीचा बनतो, विप्र (वेदपाठाद् भवेद विप्र:).
परंतु जो ब्रह्म जाणतो तो प्रथम श्रेणीचा आहे.
(ब्रह्म जानातीति ब्राह्मण) आणि नैमिषारण्यातील ऋषी हे ब्राह्मणांमध्येही सर्वोत्तम असल्याने, ते केवळ ब्रह्मच जाणत नाहीत तर भगवंतही जाणतात.
चार वर्ण व चार आश्रमांनी तयार होणा-या समाजरचनेपासून खरा मानव-समाज सुरू होतो व त्यात ब्राह्मण वर्ग अत्यावश्यक आहे.
हे चार वर्ग म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र.
आणि चार आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याशश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, सन्यासाश्रम.
वर्णाश्रम ही नैसर्गिक पद्धत आहे, कारण ती भगवंताची निर्मिती आहे. ज्याप्रमाणे शरीराचे चार विभाग आहेत-मेंदू, बाहु, उदर, पाय-त्याचप्रमाणे समाजाचेही चार विभाग आहेत-
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र. हे स्वाभाविक आहे !
शरीरात मेंदू अतिशय महत्वाचा आहे; परंतु पायही महत्वाचे आहेत, कारण जर पायांनी हालचाल केली नाही तर आपण चालू शकणार नाही. त्यासाठी मेंदू मदत करू शकत नाही.
म्हणूनच, शरीराच्या सर्व अवयवांमध्ये सहयोग असला पाहिजे. मेंदू हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग असला तरी पाय आवश्यक आहे,
बाहु आवश्यक आहे, उदर आवश्यक आहे-सर्व अवयव आवश्यक आहेत. आम्ही कोणत्याही सामाजिक विभागाला अमान्य करीत नाही; परंतु
आमचे म्हणणे असे आहे की, प्रत्येकाने श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य केले पाहिजे.
आता जाणूया मनुस्मृतीमध्ये काय लिहीले आहे -
मनुस्मृती वाचणे हे प्रतिगाम्यांचे लक्षण समजले जाते. त्याला विरोध करणा-या ९९ टक्के लोकांनी ती वाचलेली नसते. ब्राह्मण वर्णाची थोरवी सांगण्यासाठीच मनुस्मृती लिहिली गेली,
असा अपसमज मोठ्या प्रमणात आजही समाजात आहे. परंतु या स्मृतीतील विषय व त्याचा आशय ध्यानात घेतला तर मनूंवर घेतलेला आक्षेप सर्वस्वी चुकीचा आहे, हे ध्यानात येते. मनू स्वता ब्राह्मण नव्हे तर क्षत्रिय राजा होता हे लक्षात घेतले पाहिजे.
चातुर्वर्ण्यात ब्राह्मणाला सर्वाधिक सुखसोयी
नसून सर्वाधिक निर्बंध आहेत. एकच किंवा सारखा अपराध ब्राह्मण-शुद्र दोघांनीही केला तर मनुने ब्राह्मणाला शुद्रापेक्षा चौसष्ट वा एकशे अठ्ठावीसपट शिक्षा सांगितली आहे. वर्णव्यवस्थेचा विचार करता ब्राह्मणाला श्रीमंत होता येईल असा एकही व्यवसाय त्याला उपलब्ध नव्हता. तपस्वी नसलेल्या ब्राह्मणाला गळ्यात दगड बांधून पाण्यात बुडवावे असा धर्मशास्त्राचा आदेश आहे.
शुद्राने वेदाध्ययन करू नये असे म्हटले तरी त्याला ज्ञानच मिळू नये, अशासाठी ही व्यवस्था होती हे म्हणणे योग्य नाही. इतिहास, पुराणे, रामायण, महाभारत ग्रंथ यांच्या अध्ययनाने शुद्राला ज्ञान मिळवायचा मार्ग मोकळा होता.
शुद्रांवर अन्याय झाला, त्यांना वेदाधिकार मिळाला नाही, अशी गैरसमजूत आहे.
"ब्रह्मराजन्याभ्यां शुद्राय चार्याय च स्वाय चारणाय च !" (शुक्ल यजुर्वेद २६.२)
वेदांचे ज्ञान ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, आपले, परके अशा सर्वांसाठी आहे.
दुसरे असे की उत्पादनाची सर्व साधने शुद्रांच्या हाती होती. म्हणूनच त्यांनी वेदाध्ययनासाठी वेळ न देता राष्ट्रीय उत्पादन वाढवावे अशी स्पष्ट भूमिका होती. मनु आणि समर्थ रामदासांवर ब्राह्मण पक्षपाताचा आरोप केला जातो.
पण ब्राह्मणांचा गौरव संत ज्ञानेश्वर ते तुकाराम महाराजांपर्यंत सर्वच संतांनी केला आहे.
'जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, अथवा
देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी
ब्राह्मणांना भोजन देणार नाही त्याला धोका आहे. त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल' (ज्ञानेश्वरी ३.१०५ व १०८).
'वर्णांमाजीं उत्तम वर्ण ! त्या ब्राह्मणाचा देहो जाण !' (एकनाथ भागवत १७-४१९), जे उत्तमजन्मे ब्राह्मण ! त्यांसी षटकर्मी अधिकार जाण' ! (एकनाथ भागवत १७.४०३).
'ब्राह्मणे ब्राह्मणा सद्गुरू करावा ! परि न करावा शुद्रादिक !!' (श्रीतुकारामांचा अभंग ४३४२).
'करिती ब्रह्मनिरूपण ! जाणती ब्रह्म संपुर्ण ! तेचि
जाणावा ब्राह्मण ! ब्रह्मविद !!'
(दासबोध ६.४.२४).
उत्तम विद्या शुद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म
चाण्डालाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असल्यास तिचा पत्नी म्हणून
स्वीकार करावा. हितकारक वा कल्याणकारी वचन लहान मुलाकडूनही ग्रहण करावे. विद्या,
धर्म, शुचिता, उत्तम वचन आणि अनेक प्रकारच्या विद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात (२.२३८, २३९).
शुद्र म्हणजे काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर ब-याच लोकांना माहिती नसते. शुद्र म्हणजे एक शिवी आहे असा गैरसमज आजतागायत प्रचलित आहे. पुरोगाम्यांनीही "शुद्र" संकल्पनेची व्याख्या
नीट मांडली नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "शुद्र पुर्वी कोण होते ?" ह्या ग्रंथाचे असे प्रतिपादन आहे कि, आज ज्यांना शुद्र म्हटले जात आहे ते पुर्वी सोमवंशीय आर्य क्षत्रिय लोक होते.
मुल्यमापन - विचारधन वाचणा-या काही लोकांना वाटते कि, संघ वर्णव्यवस्था मानतो
म्हणजे अस्पृश्यताही मानतो. खरंतर वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचा दुरान्वये संबंध नाही. प्राचीन भारताचा इतिहास
बघितला तर कोठेही अस्पृश्यता नव्हती.
इस्लामी आणि ब्रिटीश आक्रमणापुर्वी चारही वर्णे सुखाने नांदत होती. काही लोक म्हणतात कि, जर संघाला सामाजिक समता मान्य असेल तर हा ग्रंथ फेकून द्यावा ! हा ग्रंथ फेकण्यापेक्षा वर्णव्यवस्थेचा इतिहास बघावा ! वर्णव्यवस्था कशासाठी आणि का निर्माण झाली ?, काय हेतू होता ? या प्रश्नांचा शोध घेणे आवश्यक आहे !
संघाला वर्णव्यवस्था आणायची आहे का ?
सर्व समाज एकसंध राहावा यासाठी ही व्यवस्था
निर्माण केली होती. मात्र मध्ययुगात याला विकृत स्वरूप आले. अस्पृश्यतेने हिंदू समाजात
फूट पाडली, समस्त हिंदू समाज एकमेकांपासून
दुरावला गेला. याचा गैरफायदा परधर्मीयांनी घेतला आणि त्यांनी अस्पृश्यांना प्रलोभने दाखवून आपल्या धर्मात आणले. हिंदू धर्माचा
-हास होत चालला होता. मग ही वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता नष्ट करणे अनिवार्य बनले.
राजाराम मोहनरॉय, स्वामी दयानंद सरस्वती,
स्वामी विवेकानंद, म. फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर,
रानडे, गोखले, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी शिंदे ह्यांनी हिंदू समाजाचे रक्षण केले.
"संघाला वर्णव्यवस्था आणायची आहे" असा गैरसमज प्रचलित आहे. पण गुरूजींनी आपले
प्राचीन आणि सांस्कृतिक राष्ट्राचे दर्शन ह्या ग्रंथातून घडवले आहे.
मला खात्री आहे कि, हा लेख वाचल्यावर विरोधकांचा गैरसमज अंशत: तरी कमी होईल.
मी मनुस्मृतीचे समर्थन करत नाही असे लिहीणार नाही. जे लोक माझ्या परिचयाचे आहेत आणि ज्यांना माझे विचार माहित आहेत
त्यांना माझ्यावर विश्वास आहे. ज्यांना विपर्यास करायची खोड आहे त्यांनी खुशाल करावा.
दुसरा भाग लवकर प्रकाशित होईल.
- मिहीर कुलकर्णी.
संदर्भ ग्रंथ -
विचारधन - २५, ९५, ९६.
सनातन धर्म : अध्यात्माचा खरा मार्ग - ५९, ६०,
६१.
मनुस्मृती - शंकर वासुदेव अभ्यंकर - ६, ७, ८, ९,
१०, ११, १३, १४, २८.
Comments
Post a Comment