केरळ राज्यात रा. स्व. संघाचे कार्य सगळ्यात जास्त चालते. पण गेली ७५ वर्षे मार्क्सवाद्यांच्या दडपशाही व हिंसाचारात ३०० हुन अधिक स्वयंसेवक हुतात्मा झाले.
गेली कित्येक वर्षे लाल गुंडांनी उच्छाद मांडलेला आहे.
ह्या वर्षभरात १८ स्वयंसेवकांची निर्घृण हत्या झाली,
१०० स्वयंसेवकांना कायमचे अपंगत्व आले, ५०० हुन अधिक घरांवर हल्ले झाले. हे लाल गुंड एकट्या व निशस्त्र स्वयंसेवकाला एकाकी गाठून हिणकस पध्दतीने ठार मारतात. ह्या गोष्टी आता किरकोळ बनल्या आहेत.
बहुतांशी पत्रकार डाव्यांचे पक्षपाती असल्याने ह्या घटनांची विशेष नोंद घेतली जात नाही.
जागतिक इतिहासात पाहिले तर कळेल कि, कम्युनिस्टांनी आपल्या सर्व राजकीय विरोधकांचा संपुर्ण व सर्वकष विध्वंस केला आहे. "जो आपल्यापेक्षा वेगळे मत व्यक्त करेल तो आपला शत्रू; आणि शत्रूला जगायचा हक्क नाही", हे त्यांचे धोरण आहे. मग त्याच जागतिक विचारजंतांची री ओढण्या-या भारतीय कम्युनिस्टांकडून वेगळी काय अपेक्षा करायची ? आपल्या देशातील तथाकथित बुध्दीवादी आणि विचारवंत अन्य फुटकळ विषयांवर वारेमाप प्रवचन देतात. पण स्वयंसेवकांच्या हत्येचा विषय निघताच शहामृगासारखी वाळूत चोच खुपसून बसतात.
असहिष्णूतेच्या नावाने गळा काढणारे, पुरस्कार परत करणारे, देश सोडायची धमकी देणारे मुक गिळून गप्प बसले आहेत. दहशतवाद्यांच्या मानवी हक्कासाठी लढणा-या अरूंधती रॉय, आणि राजदीप सरदेसारई, बरखा दत्त, शोभा डे, तसेच याकूब मेननची फाशी रद्द होण्यासाठी अर्ज करणारे महेश भट व नसिरूद्दीन शाह आता कुठे आहेत ? इथे राजरोसपणे स्वयंसेवकांच्या देहाची खांडोळी केली जाते, मात्र कुणाच्याही तोंडातून ब्र निघत नाही. आपले तथाकथित उदारमतवादी आपल्याच विश्वात मश्गूल आहेत. देशात जरा काही झाले कि त्याच्याविरोधात बेंबीच्या देठापासून ओरडतात. ह्यांना मानवाधिकारी कार्यकर्ते म्हणावे कि दानवाधिकारी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकशाही मोडून काढण्यासाठी नक्षलवाद, माओवादासारख्या राष्ट्रविघातक चळवळींना जन्म देणारे डावे आज संघाला फँसिस्टवादी म्हणत आहेत.
मार्क्सवादी हिंसाचाराला स्वयंसेवकांच्या माता भगिनीसुध्दा बळी पडतात. त्यांचा विनयभंग व छेडछाड करण्याचे नित्य प्रकार लाल गुंड करतात.
त्याचबरोबर स्वयंसेवकांना आर्थिकदृष्ट्या अपंग बनविण्यासाठी त्यांच्या घरांना व शेतांना आग लावणे,
वाहनांची नासधूस करणे अशा उपाययोजना केल्या जातात. तरीदेखील संघ बिथरलेला नाही, अशा प्रतिकूल वातावरणात ५००० शाखा नियमित लावल्या जातात. ह्या वातावरणात स्वयंसेवक १५ दिवस तरी प्रवास करत असतात. केरळचे राजकारण व समाजकारण हळूहळू पण निश्चितपणे बदलत आहे.
म्हणूनच डाव्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
१ मार्च २०१७ रोजी देशव्यापी धरणे आंदोलन करून डाव्यांचे राक्षसी स्वरूप रा. स्व. संघाने संर्व भारतीयांपुढे आणले. स्वयंसेवकांचे हत्यासत्र म्हणजे कम्युनिस्ट काळसर्पाचे शेवटचे आचके असतील.
- मिहीर कुलकर्णी.
Comments
Post a Comment